शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Thursday 22 October 2015

माहया सरची गाडी

“माह्या सरची गाडी”
              तो एक नवयुवक. गुरुजीची नोकरी लागली. पण पर जिल्यात. एका पारधी समाज्याच्या तांड्यावर. जिथं शिक्षण आणि शाळा पिढ्यानपिढ्या पासून कशाशी खातात हेच माहित नाही अश्या ठिकाणी.पण तोही अस्सल गुरुजी.नव्या पिढीचा. अर्थात तुमच्या-माझ्या सारखा. ज्या दिवशी रुजू झाला तो दिवस शाळा नावाच्या वास्तूला समजून घेण्यातच गेला. दिवसभर एकही पोरगं शाळेकडं फिरकल सुद्धा नाही.पण त्यांनी हार मानली नाही. तो रोज पालावर जायचा.पोरांच्या आई-बापांना पोरांना शाळेत पाठवायला सांगायचा. हळूहळू त्या अडाणी लोकांना पटायला लागलं आणि वेगवेगळ्या वयाची कधीही शाळेत न गेलेली ती रानफुलं शाळा नावाच्या तुरुंगात येवून बसू लागली. रानावनात लीलया फिरणारी ती मुलं शाळेत मात्र अवघडून बसत.पण आपला मित्रही काही कमी नव्हता. त्यानी अशी काही जादू केली कि त्या पोरांना गुरुजी आवडू लागला. रानात काट्याकुट्यात ससा,तितर सहज पकडणारे हात ग म भ न गिरवायला लागले.
              नोकरी मिळाल्यावर आपल्या मित्रांनी त्याची ड्रीम बाईक घेतली. रोज सकाळी तो स्वतः आंघोळ करण्यापूर्वी गाडीला साफ-सुफ करायचा मगच शाळेची तयारी. नव्या कोऱ्या बाईक वरून शाळेच्या ठिकाणी जावून-येवून करण्य्यात तो रोज थ्रिल अनुभवायचा. ती गाडी त्याची जिवाभावाची मैत्रीणच बनून गेली.होती.एक साधा ओरखडा किंवा किंचित धूळही गाडीवर पाहून अस्वस्थ व्हायचा. रोज शाळेच्या समोर एका झाडाखाली गाडी लावून शाळा सुरु व्हायची.
               आनंददायी शिक्षण पद्धती वापरल्यामुळ गुरुजी ला मुलांना रागवायची पाळीच कधी येत नव्हती. पोरं रोज सराची गाडी यायची वाट बघत शाळे जवळ येवून थांबत आणि गाडी गेल्यावरच घरी जात. पण............पण एखादं सुंदर स्वप्न मोठा आवाज झाल्यावर दचकून झोप मोडून सहज मोडावं तसं झालं त्या दिवशी. रोजच्या प्रमाणे तो गाडीजवळ गेला आणि त्याला डोळ्यांवर विश्वासच बसेना. गाडीच्या टाकीवर कुणीतरी टोकदार दगडांनी काहीतरी कोरलं होतं. ‘माह्या सरची गाडी’ हि अक्षरं सुद्धा त्याला दिसली नाहीत.दिसले  ते फक्त त्याच्या आवडत्या गाडीच्या टाकीवर ओढलेले ओरखडे. तो प्रचंड संतापला. पोरं समोरचं उभी होती.कधीही न सुटलेला त्याचा तोल गेला. तो त्या पोरांना अद्वा-तद्वा बोलू लागला. त्याच्यातील सदसदविवेकबुद्धी पार हरवून गेली. फक्त राग आणि राग.पोरं घाबरून गेली. त्यांनी सरांना कधीही रागवलेले पाहिलं नव्हत. पण आज मात्र त्यांचा सर प्रचंड संतापून त्यांना शिव्या-शाप देत होता.आणि एकच विचारात होता.सांगा कुणी गाडी खराब केली?माझ्या गाडीवर ओरखडे कुणी ओढले? पण या रागाच्या प्रसंगी कोण पुढं येणार. सगळी पोरं एकमेकाच्या तोंडाकड बघत होती.
               इतक्यात एक चिमुरडी पुढं झाली आणि होणाऱ्या परिणामांची काळजी न करता म्हणाली, ‘ सर, मी लिव्हलं तुझ्या गाडीवर. तो चिडला आणि विचारू लागला का पण. शेवटी ती बोलू लागली काल गावातून अशीच एक गाडी चोरीला गेली मला वाटलं सरची गाडी कुणी चोरून नेली तर. म्हणून मी लिव्हलं. इतका वेळ फक्त स्वार्थी अविचारी रागानी त्याच्या मनाचा ताबा घेतला होता. पण त्या पोरीचे शब्द ऐकले आणि टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात. इतका वेळ आरोपी सापडला कि त्याला शिक्षा करायला शिव-शिवणाऱ्या हातात त्यांनी ते चिमुकले हात घेतले आणि त्यांच्यावर ओठ टेकवले............आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
              आजही आपला तो मित्र मोठ्या दिमाखात ती गाडी वापरतोय आणि जर कुणी विचारलं तर सांगतोय कि हा मला मिळालेला राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारही पेक्षा मिळालेला मोठा पुरस्कार आहे........
              मूळ कथा .....सोमनाथ वाळके
              शब्दांकन अविनाश घोडके, सोनाळवाडी....

1 comment:

  1. त्या विद्यार्थ्याच्या शिक्षकाप्रती असलेल्या प्रेमाला माझा सलाम

    ReplyDelete